कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी करावी
आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.
शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि या रात्री चंद्राच्या शीतल प्रकाशातून अमृतवर्षाव होतो. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याने या दिवसाला जास्त महत्व दिले जाते. म्हणून ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला ‘कोजागरव्रत‘ म्हणतात.
लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त व्हावी म्हणून दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी–कुबेर–इंद्र–चंद्र आदी देवतांची पूजा केली जाते. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे तो पाहत असतो. वारंवार तो कोजागरती असे विचारतो अर्थात , को जागरती = कोण जागं आहे !…. यावरून या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा हे नाव रूढ झाले.
या दिवशी घरातील लहान मुलामुलींचे सकाळी अंघोळ झाल्यावर औक्षण करावे . व रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. या दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात .
जेव्हा दुधामध्ये चंद्र देवतेचि किरणे पडतात. तेव्हा त्या दुधाचे रूपांतर अमृता मध्ये बनते . प्रथम दूध छोटया वाटी मध्ये घेऊन आकाशाकडे तोंड करून गणपती बाप्पाला प्रार्थना करून दूध प्राशन करण्याचे आवाहन करावे. त्यांनतर लक्ष्मी देवी , कुबेर देवता व इंद्र देवतेला हि नैवेद्य प्राशन करण्याचे आवाहन करावे. इंद्र देवतेला हा नैवेद्य दाखवताना इंद्र गायत्री मंत्र म्हणावं.
| |इंद्र गायत्रीमंत्र ||
” ॐ सहस्त्र नेत्राय विदमहे
वज्र हसताय धिमही
तन्नो इंद्र प्रचोदयात ! ”
त्यानंतर आपल्या घरात असणाऱ्या मंदिरात तो दूधाचा नैवेद्य दाखवून, तो दुधाचा प्रसाद घरातील प्रत्येकानी ग्रहण करावा . अशा पद्धतीने तुम्ही कोजागिरी पौर्णिमा साजरी करु शकता आणि या दिवसाचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.